महामंडळांच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवा- पालकमंत्री संदिपान भुमरे
छत्रपती संभाजीनगर,दि.9(जिमाका)- शासनाने विविध समाजघटकातील
गोरगरिबांच्या आर्थिक उन्नती व स्थायी उत्पन्न स्त्रोतासाठी विविध महामंडळांची
निर्मिती केली आहे. त्याद्वारे उद्योग व्यवसायासाठी कर्ज रुपाने अर्थसहाय्य दिले
जाते. अशा गरजू लोकांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवून त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध
करुन द्यावे,असे निर्देश राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज येथे दिले.
पालकमंत्री श्री. भुमरे
यांच्या अध्यक्षतेखाली विविध महामंडळांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा
घेण्यात आला. बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अपर जिल्हाधिकारी डॉ.
अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)
प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अर्चना खेतमाळीस, जिल्हा अग्रणी बॅंकेचे
केदारे, तसेच विविध महामंडळांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. भुमरे यांनी
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय
वित्त आणि विकास महामंडळ, महाराष्ट्र
राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती
विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास
महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ
अशा महामंडळांचा आढावा घेतला. लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया, लाभार्थ्यांना
देण्यात आलेला लाभ व त्यातून त्यांचे झालेले आर्थिक स्वावलंबन याबाबी अंतर्भूत
होत्या. जिल्ह्यात गरजू लोकांपर्यंत या महामंडळांच्या योजना पोहोचवाव्या व
जिल्ह्यात विविध समाज घटकांना आर्थिक स्वावलंबी बनवावे,असे त्यांनी सांगितले. लाभार्थ्यांना
देण्यात आलेले अर्थसहाय्य त्यासाठी केला जाणारा बॅंक व्याज परतावा आदी योजनांचाही
लाभ देण्यात यावा. जेणे करुन कर्ज परतफेडीचा दर चांगला राखता येईल, असेही त्यांनी
सांगितले.
00000
Comments
Post a Comment