जिल्ह्याभरात ‘जल जागृती’ साठी नऊ रथ रवाना
छत्रपती संभाजीनगर, दि.२२ (जिमाका):- ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा, गावातील पाण्याचे स्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे यासाठी जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा -२, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजनांविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून नऊ जल रथ आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात
सकाळी पावणे दहा वा. हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी तथा प्रशासक विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जल जीवन मिशनचे
प्रकल्प संचालक राजेंद्र देसले आदी यावेळी उपस्थित होते
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता
विभागाकडून राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३५१ तालुक्यातील गावांमध्ये जल रथाच्या माध्यमातून
प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यात जल रथाद्वारे
प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल. या नऊ रथांचे सनियंत्रण जिल्हा कक्षावर नोडल
अधिकारी म्हणून जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक, तालुका पातळीवर गट विकास अधिकारी
तसेच शासन नियुक्त प्रतिनिधी करणार आहेत. समन्वयकांमार्फत योजनेची माहिती
ग्रामस्थांना दिली जाणार आहे. गावातील जलस्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी
सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी केली तर शासनाच्या पोर्टलवर मागणी ऑनलाईन नोंदवण्यात
येणार आहे.
ग्रामस्थांनी जल रथाच्या माध्यमातून योजनांची
माहिती घेऊन गावातील पाण्याचे स्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी नोंदविण्याचे
आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा
प्रशासक विकास मीना, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं) डॉ.ओमप्रकाश रामावत , जल
जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी
(मग्रारोहयो) अनुपमा नंदनवनकर, ग्रामीण पाणीपुरवठ्याचे
कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, उप कार्यकारी अभियंता दत्तात्रय श्रीखंडे, जिल्हा
समन्वयक बाबासाहेब गीते यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment