‘मम्मी-पप्पा मतदान करा’, १४ हजार शालेय विद्यार्थ्यांचे पत्र
छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका):- ‘ कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन मतदान करा आणि आपली लोकशाही मजबूत करा’, हे शब्द म्हणजे मतदानाचे महत्त्व सांगणारे असले तरी या शब्दांना एक आगळे वेगळे महत्त्व आहे. कारण हे शब्द शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या मम्मी-पप्पांना उद्देशून लिहिले आहेत.
मतदार जनजागृतीचा भाग म्हणून औरंगाबाद मध्य (१०७) या विधानसभा मतदार
संघात हा प्रयोग राबविण्यात आला. छत्रपती संभाजीनगर शहराचा मोठा भाग यात समाविष्ट होतो.
जवळपास १२६ शाळांमधील इयत्ता ५ वी ते ९ वी च्या शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या आई बाबांना
म्हणजेच मम्मी पप्पांना भावनिक पत्र लिहून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. १२० खाजगी
तर ६ मनपा शाळांमधील विद्यार्थी यात सहभागी झाले. तब्बल १४ हजार विद्यार्थ्यांनी शाळेत
ही पत्रे लिहिली. आणि आपल्या मम्मी पप्पांना नेऊन दिली.
उपविभागीय अधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकट राठोड
यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. तहसिलदार शिवानंद बिडवे यांनी
हा उउपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले. सर्व शाळा व त्यांच्या मुख्याध्यापकांनी यात
सहयोग दिला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे त्यांच्या घरी पत्र नेऊन दिल्यावर आई बाबांनी
मोठ्या कौतुकाने स्वागत केले. आपलीच लेकरं आपल्याला आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव
करुन देतायेत म्हटल्यावर आई बाबांच्या चेहऱ्यावर लेकराचं कौतूक ओसांडून वाहतांना दिसत
होते.
०००००


Comments
Post a Comment