जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समिती बैठक : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्दिष्ट पूर्ण करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका):- मराठवाडा विभागात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत रोजगार देण्यासंदर्भात जिल्ह्याचे उद्दिष्ट सर्वात कमी साध्य झाले आहे. तरी सर्व बॅंकांनी या कार्यक्रमांतर्गत पात्र व्यक्तिंना लाभ देऊन स्वयंरोजगारास चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिले.
जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीची बैठक आज
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस रिजर्व बॅंकेचे सहा. महाव्यवस्थापक
नरसिंग कल्याणकर, नाबार्डचे सहा. महाव्यवस्थापक सुरेश पटवेकर, बॅंक ऑफ
महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक विवेक
नाचणे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड, जिल्हा अग्रणी बॅंक
व्यवस्थापक मंगेश केदार, तसेच सर्व बॅंकांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी मुख्यमंत्री
रोजगार निर्मिती कार्यक्रमाचाआढावा घेतला. जिल्ह्यात ११५० चे उद्दिष्ट असतांना ४५५
इतके उद्दिष्ट साध्य झाले आहे. उर्वरित उद्दिष्ट सर्व बॅंकांनी मिळून पुर्ण करावे
असे निर्देश त्यांनी दिले.
निवडणूक आचारसंहिता कालावधीत बॅंकांनी
त्यांच्याकडील रोख रकमेची होणारी वाहतुक ही निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे
सीव्हिजील या पोर्टलवर नोंद करुनच करावी,असेही त्यांनी सांगितले. विविध बॅंकांच्या
जिल्ह्यातील ५४० शाखांनी या पोर्टलशी संलग्न केले असल्याची माहितीही यावेळी देण्यात
आली. तसेच याच संदर्भात ई-एसएमएस प्रणालीसंदर्भात सर्व बॅंक अधिकाऱ्यांचे स्वतंत्र
प्रशिक्षण निवडणूकीच्या अनुषंगाने घेण्यात यावे,असे निर्देशही त्यांनी दिले.
नाबार्ड मार्फत जिल्ह्यासाठी सन २०२४-२५
करिता १२ हजार ७६५ कोटी रुपयांचा संलग्नित संभाव्य पतआराखडा सादर करण्यात आला. त्यात पिककर्ज, कृषी कर्जे,
सुक्ष्म व लघु उद्योगात व इतर प्राधान्य क्षेत्रात गुंतवणीकीबाबत सर्व बॅंकांनी
द्यावयाच्या पतपुरवठ्याचे नियोजन सादर करण्यात आले.
गेल्या काही दिवसांत कर्जमाफीच्या फसव्या
घोषणा, व्हिडीओ, मेसेज व्हायरल होत असून याप्रकाराला कोणीही बळी पडू नये असे
आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावध रहावे व अशा
प्रकारांना बळी पडू नये असेही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आवाहन केले.
०००००
Comments
Post a Comment