एमजीएममध्ये मतदार जनजागृती: विद्यार्थ्यांनो मतदान करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 





छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका):- संपूर्ण जगामध्ये भारतीय लोकशाहीची महान व यशस्वी लोकशाही म्हणून ओळख आहे. लोकशाहीतील महत्त्वाचा भाग म्हणजे मतदान करणे. मतदान करणे हे आपल्या सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाही बळकट आणि सुदृढ करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.  

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ संदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हा निवडणूक कक्ष आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वीप’  ('सिस्टिमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टीसिपेशन प्रोग्रॅम') उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, उपजिल्हाधिकारी चेतन गिरासे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. आर. आर. देशमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, मतदानाची टक्केवारी कमी होत असून ती वाढवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूच्या लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना या प्रक्रियेत सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. 'ग्रेटर पार्टीसिपेशन फॉर स्ट्रॉन्गर डेमोक्रसी' ही यंदाची थीम निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आणखीही आपली नावनोंदणी केलेली नाही त्यांनी ती तात्काळ करून घ्यावी. अगोदरच्या पेक्षा आता मतदान करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. मतदान करण्यासाठी मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोग सुट्टी जाहीर करते. निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पाणी, वैद्यकीय सुविधा, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष सुविधा, पाळणा घर आदींसह इतर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. 

कुलगुरू डॉ. विलास सपकाळ म्हणाले, निवडणूक प्रक्रियेसाठी खूप मोठी यंत्रणा देशभरात राबवली जाते. मतदान करणे हा आपला अधिकार आहे. मतदानादिवशी विद्यापीठ कोणतीही परीक्षा आयोजित करीत नाही. सर्वांकडे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र ही आपली स्वत:ची ओळख असते.

कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी- कर्मचारी आदी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा