युवकांनो उज्ज्वल भवितव्यासाठी मतदान करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका):- युवकांनो तुम्हीच देशाचे भविष्य आहे. तुम्हाला तुमचे स्वतःचे भवितव्य घडवायचे असतांनाच देशाचेही भवितव्य घडवायचे आहे. त्यासाठी मतदान करा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात निवडणूक
जागृती क्लब मार्फत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
औरंगाबाद (पश्चिम) अर्चना खेतमाळीस, प्राचार्य संजय दांबरे, प्राध्यापक,
विद्यार्थी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, आजचा युवक देशाचे
भविष्य आहे. युवक हा देश घडवत असतो. मतदान प्रक्रियेमध्ये युवकांनी
सहभागी व्हावे. मतदान करून सक्रिय सहभाग घ्यावा. त्याचप्रमाणे आपले मित्र,सहकारी आणि
कुटुंबातील व्यक्तींना मतदान करण्यासाठी सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आपली सुदृढ लोकशाही असून ती टिकवणे ही
आपली जबाबदारी आपण मतदानाच्या माध्यमातून पार पडावी. लोकशाही आणि आपला देश सुदृढ आणि
विकसित करण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावा. आपले शिक्षण-संशोधन यातील योगदानातून लोकशाहीला
समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा व मतदान जागृती मध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी
केले. मतदान जाणीव जागृती साठी रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजनही
महाविद्यालयात करण्यात आले होते. त्यापूर्वी मतदार जागृती साठी प्रभात फेरी काढण्यात
आली होती.
०००००
Comments
Post a Comment