नवनियुक्त तलाठ्यांचे प्रशिक्षण : ‘विश्वस्त’ म्हणून काम करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 





 छत्रपती संभाजीनगर दि.(जिमाका)- तलाठी हा महसूल यंत्रणेचा गावपातळीवर काम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असून महसूल प्रशासनाचा पाया आहे. त्यामुळे आपण  विश्वस्त म्हणून काम करावे,अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नवनियुक्त तलाठ्यांना मार्गदर्शन केले.

            जिल्हा प्रशासनात नव्याने रुजू झालेल्या ५३ तलाठ्यांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, विभागीय आयुक्त कार्यालयातील एम.के.पाटील यांनी या नवनियुक्त तलाठ्यांना मार्गदर्शन केले.

            निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी प्रास्ताविकात उपस्थितांना शासकीय सेवेचे महत्त्व, गाव पातळीवर काम करतांना पार पाडावयाची जबाबदारीबाबत माहिती दिली.

            जिल्हा माहिती अधिकारी डॉ. दुसाने यांनी ‘सद्यस्थितीतील प्रशासन’ या विषयावर मार्गदर्शन केले. गावपातळीवर काम करतांना सुसंवाद राखून काम करावे,असे त्यांनी सांगितले. एम.के. पाटील यांनी महसूल विभागातील तलाठी कार्यालयातील विविध नोंदी, दाखले त्याचे नियम व तत्संबंधित माहिती दिली.

            जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, आपण आपले काम करतांना नेहमी सकारात्मक भावनेने करा. आपला एक निर्णय लोकांच्या आयुष्यात बदल घडवू शकतो. लोकांशी चांगले वागा. आपण लोकसेवक आहोत. त्यादृष्टिने त्यांच्याशी संवाद ठेवा. लोकांचे शंका समाधान केल्याने प्रशासनाची प्रतिमा चांगली होते.  लोकांची कामे वेळच्या वेळी झाली पाहिजेत यादृष्टीने आपले कामाचे नियोजन करा, अशा शब्दात जिल्हाधिकारी स्वामी यांनी मार्गदर्शन केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा