नगरपरिषदांनी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर दि.२४ (जिमाका)- जिल्ह्यातील नगरपरिषदांनी आपापले उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करुन लोकांना अधिकाधिक सुविधा द्याव्यात,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज मुख्याधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.
वैजापूर, सिल्लोड, कन्नड,
पैठण, गंगापूर, खुलताबाद, या नगरपरिषदा व फुलंब्री व सोयगाव या नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची
आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. गंगापूर न.प. मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे,वैजापूर
न.प. मुख्याधिकारी बी.यु. बिघोत, फुलंब्री नगर पंचायत मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव,
कन्नड न.प मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, सिल्लोड न.प. मुख्याधिकारी सय्यद रफिक, पैठण न.प. मुख्याधिकारी संतोष जागळे आदी उपस्थित
होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी
या सर्व नगरपरिषदांच्या भागातील कर वसुलीचा
आढावा घेतला. जिल्हाधिकारी म्हणाले की, नगरपरिषदांनी आपापल्या कार्यक्षेत्रात मालमत्तांचे
सर्व्हेक्षण करुन कर आकारणी, मालमत्तांच्या
करनिर्धारणाचे पुनर्मुल्यांकन करणे याबाबत कार्यवाही करावी. त्यामुळे नगरपरिषदांचे
उत्पन्न वाढून आपणास आपल्या शहरातील नागरिकांना उत्तम सेवा देता येईल. सर्व नगरपरिषदांनी
आपापल्या कार्यक्षेत्रात पावसाळा कालावधीत वृक्ष लागवडीला अधिकाधिक चालना द्यावी. वृक्ष
संगोपनासाठी पालकत्व निश्चित करुन द्यावे,असे निर्देश त्यांनी दिले.
पावसाळ्याच्या अनुषंगाने आरोग्य
व्यवस्था सज्ज ठेवावी. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करुन नागरिकांचे आरोग्य
उत्तम राहिल यादृष्टिने उपाययोजना राबवाव्या असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी
स्वामी यांनी पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन,स्वच्छ सर्व्हेक्षण,
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान याबाबत आढावा घेतला.
०००००
Comments
Post a Comment