जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण: लोकसेवेचा आनंद हाच खरा ब्रह्मानंद- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर दि.१२(जिमाका)- शासनाची सेवा करतांना प्राप्त अधिकारांच्या आधारे सामान्य लोकांची कामे मार्गी लावून दिल्यास त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद कर्तव्यपूर्तीचे समाधान देतो. लोकसेवेतील हा आनंद हाच खरा ब्रह्मानंद आहे.आपण साऱ्यांनी उत्कृष्ट कामकाज करुन शासनाची प्रतिमा जनमानसात उंचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांचे
अधिकारी व सर्व श्रेणीतील कर्मचारी यांचे प्रशिक्षण आज जिल्हा नियोजन सभागृहत पार पडले.
‘प्रशासकीय कामकाज व संवाद कौशल्य’, या विषयावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थितांना
मार्गदर्शन केले. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद
खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सुचिता शिंदे, प्रविण फुलारी, एकनाथ बंगाळे,
रामदास दौंड तसेच सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी महाराष्ट्र
नागरी सेवा अधिनियम १९७१, त्यात असणाऱ्या सेवां संदर्भातील तरतूदी, सेवा हक्क अधिनियम,
माहिती अधिकाराचा कायदा, वेळेचे महत्त्व व बंधन, सचोटी व कर्तव्यपरायणता, कार्यालयीन
स्वच्छता, सहा गठ्ठे पद्धती, संचिकांची निंदणी,
नस्ती लेखन, पत्रव्यवहार, प्रशासनतील कौशल्य, बैठकांचे आयोजन व इतिवृत्त लेखन अशा विविध
बाबींविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, आपल्याकडे
कामे घेऊन येणाऱ्या व्यक्तिच्या जागी स्वतः असल्याची कल्पना करुन त्या व्यक्तिशी कसे
वागावे हे ठरवा. आलेल्या व्यक्तिशी किमान चांगले बोलणे, त्याचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे
आहे. कुणाचेही काम शक्यतो एकाच भेटीत व्हावे यासाठी त्यांना परिपूर्ण माहिती द्या.
वारंवार चकरा मारायला लावू नका. आलेली पत्रे, निवेदने याची वेळीच दखल घेऊन त्यांना
तात्काळ उत्तर द्या. चांगली वागणूक दिल्यास लोकांमध्ये शासनाविषयी चांगली प्रतिमा निर्माण
होते. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करतांना लोकांशी उत्तम संवाद ठेवणे हे महत्त्वाचे
आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक विनोद खिरोळकर यांनी तर आभार
प्रदर्शन एकनाथ बंगाळे यांनी केले.
०००००
Comments
Post a Comment