जरजरी बक्ष उर्स सोहळ्यात भाविकांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 


छत्रपती संभाजीनगर, दि.३(जिमाका)- जरजरी बक्ष उर्स महोत्सवात भाविक, महिला यांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य देण्यात यावे, त्यादृष्टीने सर्व तपासण्या वेळीच पूर्ण कराव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व संबंधित यंत्रणाना दिले.

        हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर जरी बक्ष यांचा ७३८ वा उर्स महोत्सव दि.९ ते १७ दरम्यानखुलताबाद येथे होत आहे. या निमित्त प्रशासनामार्फत कराव्याच्या पूर्व तयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद येथे दर्गा स्थळी जाऊन आढावा घेतला.

         पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड,तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक धनंजय वराडे, नगरपालिका मुख्याधिकारी विक्रम दराडे, दर्गा कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद, ऍड कैसेरोद्दीन, मुबशिरोद्दीन, कामारानोद्दीन आदी उपस्थित होते.

       बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, उर्स महोत्सवात येणारे भाविक, त्यातही महिला भाविक, लहान बालके यांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य द्यावे. यात्रेत विकले जाणारे खाद्य पदार्थ हे भेसळयुक्त नसावे यादृष्टीने अन्न, खाद्य पदार्थ नमुन्यांची तपासणी करण्यात यावी. तपासणी शिवाय खाद्य पदार्थ विक्री साठी ठेवता येणार नाही.तसेच गॅस सारख्या इंधनाची, पेट्रोल, डिझेल सारखे पदार्थ यांची साठवणूक व वाहतूक सुरक्षितता लक्षात घेऊन करावी. यात्रा परिसरात सिसिटीव्ही कॅमेराद्वारे निगराणी ठेवावी. गुप्तचर पोलीस, महिला पोलीस यांच्यासह दर्गा कमिटीचे स्वयंसेवक यांनी यात्रेत फिरून असामाजिक, संशयस्पद व्यक्तींवर नियंत्रण ठेवावे. कुणीही गैरकृत्य करतांना आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी. हरवलेली बालके, व्यक्ती यांच्या शोधासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष व उदघोषणा यंत्रणा कार्यान्वित करावी.

       पोलीस अधीक्षक डॉ. राठोड म्हणाले की, पोलीस बंदोबस्त पुरेसा असेल. उर्स उत्सवात होणारी लोकांची गर्दी पाहता सुरक्षा उपायांची अंमलबजावणी केली जाईल. तसेच समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा