महिलांना समानतेची वागणूक हवी; ‘महिला सुरक्षितता’ कार्यशाळेतील सूर

 







छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- महिला आर्थिकदृष्टया सक्षम होण्याबरोबरच ‘नागरी संस्कृती’त अपेक्षित असलेली दर्जा व समानतेची वागणूक महिलांना मिळणे गरजेचे आहे,असा सूर महिला सुरक्षितता कार्यशाळेत व्यक्त झाला.

            डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्यावतीने ’महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ संदर्भात शुक्रवारी (दि.२०) एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. विद्यापीठाच्या नाट्यगृहात शुक्रवारी (दि.२०) सकाळी १० ते ५ या दरम्यान कार्यशाळा झाली. कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,  कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.रणजितसिंग निंबाळकर, समन्वयक म्हणून डॉ.पुष्पा गायकवाड यांची  मंचावर उपस्थिती होती. तर ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.अर्चना गोंधळेकर, सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिवंसरा, दामिणी व भरोसा सेलप्रमुख तेजश्री पाचपुते यांनी साधन व्यक्ती म्हूणन मार्गदर्शन केले.

            विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी उद्घाटनपर भाषण केले. ते म्हणाले, ’रामायण, महाभारत’ काळापासुन कोणत्याही काळात महिलांना दोष देणे थांबविले पाहिजे. आपण आता माहिती तंत्रज्ञान युगात असून मानसिकताही अधुनिक असणे गरजेचे आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. त्यामुळे त्यांना सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे आहे.

            ’महिला सुरक्षिते’ संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. प्रशासनाच्यावतीने पुढील आठवडयापासून शाळा, महाविद्यालयात युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

            महिलांना सन्मानाची वागणूक देण्याची नैतिक जबाबदारी कुटूंबप्रमुखांसह सर्व सदस्यांची आहे, असे कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले. या संदर्भात विद्यापीठ स्तरावर उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

            कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविक यांनी प्रास्ताविक केले. भरोसा सेलच्या प्रमुख तेजश्री पाचपुते यांनी स्त्रीयांच्या सुरक्षितेसंदर्भातील विविध कायद्याची सविस्तर माहिती दिली.

            दुपारच्या सत्रात उच्च शिक्षण विभागातील संतोष थेरोकर यांनी शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन केले. डॉ.कैलास अंभुरे यांनी सूत्रसंचालन तर श्रीमती मीरा मस्के यांनी आभार मानले.

            या कार्यशाळेत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच विद्यापीठातील विभागप्रमुख असे ३३० प्रतिनिधी सहभागी झाले.

महिला सन्मानाची सुरुवात घरापासून करा : अ‍ॅड.गोंधळेकर

‘चॅरीटी बिगीन्स अ‍ॅट होम’ असे म्हटले जाते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या घरातील सर्व महिलांना सन्मानाची वागणूक देऊन याची सुरुवात करा, असे आवाहन प्रख्यात विधिज्ञ अ‍ॅड. अर्जना गोंधळेकर यांनी केले. भवरीदेवी, निर्भया व आता कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराची घटना हा आपल्या समाजाचा मानसिक स्तर घसल्याची चिन्हे आहेत, विशाखा, पॉक्सो यासह विविध कायद्या संदर्भात अ‍ॅड.गोंधळेकर यांनी सोउदाहरण मार्गदर्शन केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा