निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.१८ (जिमाका):- मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करणे, मतदारामध्ये जाणीव जागृती निर्माण करुन मतदानाची टक्केवारी वाढविणे अशा निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांचा महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
विधानसभा निवडणूकीच्या
पार्श्वभूमीवर आज शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात
आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
विकास मीना ,शिक्षण अधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती
लाटकर, शिक्षणाधिकारी (योजना) श्रीमती अरुणा भूमकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाळेचे
मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
जिल्ह्यात मतदान
प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त मतदान केंद्र हे शाळेतच असल्यामुळे शाळेमध्ये असणाऱ्या
सर्व सुविधांचा आढावा आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला. शाळेमध्ये असलेले
सुरक्षित वातावरण, स्वच्छता, पिण्याचे पाण्याची सुविधा, संरक्षण भिंत, सीसीटीव्ही यंत्रणा
आणि आवश्यक फर्निचर या उपलब्धतांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. ज्या शाळेमध्ये सुविधा
उपलब्ध नाही तेथे तात्काळ सुविधा तयार करून
घ्याव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. तसेच आदर्श मतदान केंद्र स्थापन
करण्यासाठीही शिक्षकांनी योगदान द्यावे. मतदारांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध
करण्यासाठी योग्य ते नियोजन व खबरदारी संबंधित मतदान केंद्राध्यक्ष व तलाठी ग्रामसेवक
यांनीही घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. निवडणूक प्रक्रियेत सहभागी
असणाऱ्या शिक्षक व अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक कालावधीमध्ये मुख्यालय सोडू नये.
याबाबत शिक्षण विभागाने खबरदारी घ्यावी व सर्व शिक्षकांपर्यंत ही सुचना शिक्षण विभागामार्फत सर्व शिक्षक व संबंधित यंत्रणा
यांच्या पर्यंत पोहोचवावी असे, निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
०००००





Comments
Post a Comment