बुधवार (दि.२५) पर्यंत १८ ते ७० वर्ष वयोगटातील नागरीकांचे होईल प्रकृती परिक्षण
छत्रपती संभाजीनगर,दि.१९ (जिमाका):- ‘देश का प्रकृती परिक्षण’ या अभियानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असुन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रकृती परिक्षणाने या अभियानाचा प्रारंभ झाला आहे. दि.२५ पर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे. या अभियानांतर्गत देशातील १८ ते ७० वर्षापर्यंतच्या सर्व नागरिकांचे प्रकृती परिक्षण आयुर्वेद डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, खाजगी तसेच आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी करणार आहेत. प्रकृती परिक्षणानंतर आयुष मंत्रालयाकडुन व्यक्तीच्या प्रकृतीनुसार आहार-विहार, पथ्य-अपथ्य, दिनचर्या, ऋततुचर्या इ.बाबत नियमित मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्हा आयुष कक्षाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील नागरिकांचे
प्रकृती परिक्षण करण्याचे नियोजन केले आहे. या निमित्ताने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय
धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा आयुष अधिकारीडॉ.शेख शकील
अहमद यांनी सर्व वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक
आरोग्य केंद्रे, आयुर्वेद व युनानी दवाखाने, आरोग्य वर्धिनी केंद्रे व आर.बी.एस.के.पथकातील
आयुर्वेद वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. जिल्हयातील आयुर्वेद महाविद्यालयांचाही
या मोहिमेत सहभाग असणार आहे.
या मोहिमेत छत्रपती शाहु महाराज आयुर्वेद महाविद्यालय,
कांचनवाडी यांच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालय चिकलठाणा येथे १८ ते ७० वर्षाच्या नागरिकांसाठी
दि.२५ डिसेंबर पर्यंत तज्ज्ञ आयुर्वेद डॉक्टरांमार्फत प्रकृती परिक्षणाची सुविधा सुरु
करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रकृती
परिक्षण करण्यात येणार आहे व त्याची सुरुवात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
विकास मीना यांच्या प्रकृती परीक्षणाने करण्यात आली.
०००००


Comments
Post a Comment