इलेक्ट्रिक वाहन रॅली उद्या (दि.२९):प्रदूषणमुक्त भविष्यासाठी पुढाकार

 


छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)- महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) आणि ऊर्जा दक्षता ब्युरो (BEE) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.२९ रोजी इलेक्ट्रिक वाहन रॅली आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता टी.व्ही. सेंटर मैदानावरून ही रॅली सुरू होईल आणि क्रांती चौक येथे समारोप होईल. या रॅलीचे उद्घाटन अपारंपारीक उर्जा मंत्रीनअतुल सावे यांच्या हस्ते होणार आहे. जास्तीत जास्त ई- वाहनांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विनोद सिरसाट यांनी केले आहे.

ई-वाहनांचा प्रसार आणि प्रोत्साहन

इंधनावर असलेले परकीय अवलंबन कमी करून स्वच्छ आणि हरित ऊर्जा वापरणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च करावे लागते. भारत हा चीननंतर सर्वाधिक फॉसिल फ्युएल आयात करणारा देश आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक ई-वाहनांना प्रोत्साहन देणे आणि चार्जिंग सुविधांचा विस्तार करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१

राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन, चार्जिंग सुविधा, गुंतवणूक आणि संशोधन वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०२१ मध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले. यामध्ये २०२५ पर्यंत १०% नवीन वाहने इलेक्ट्रिक असावीत आणि सार्वजनिक वाहतूक, मालवाहतूक आणि खासगी वाहन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ई-वाहनांचा वापर वाढवावा, अशी उद्दिष्टे आहेत.

महत्वाची उद्दिष्टे

  • २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १०% हिस्सा ई-वाहनांचा असेल.
  • मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये २५% सार्वजनिक वाहतूक ई-वाहनांची असेल.
  • MSRTC च्या ताफ्यात १५% बस ई-वाहने असतील.
  • राज्यात इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होईल.
  • चार्जिंग स्टेशनसाठी प्रत्येक ३ किमी अंतरावर एक सार्वजनिक चार्जिंग सुविधा उभारण्यात येईल.

ई-वाहनांना प्रोत्साहन आणि कर सवलती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले की, राज्यातील मंत्र्यांसह शासकीय अधिकाऱ्यांना ई-व्हेईकल प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्रकल्प उभारले जात आहेत, ज्यामुळे राज्य हे राष्ट्रीय ई-व्हेईकल कॅपिटल बनेल.

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सहभागाचे आवाहन

या उपक्रमाद्वारे वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी होईल तसेच नागरिकांमध्ये ई-वाहनांबाबत जनजागृती होईल. त्यामुळे सर्व ई-वाहन उत्पादक, डीलर्स आणि वापरकर्त्यांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विनोद सिरसाट यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा