जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना .बालहक्क संरक्षणाची पंचसूत्री; १ मे पासून जिल्ह्यात अंमलबजावणी
छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- बाल कामगार, बाल भिक्षेकरी, शाळा बाह्य मुले, बालकांचे आरोग्य आणि बाल विवाह या सर्व समस्यांचे समूळ निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘पंचसुत्री; बालहक्क संरक्षणाची’ हा कालबद्ध कार्यक्रम तयार केला असून सर्व संबंधित विभागांमार्फत महाराष्ट्र दिन अर्थात दि.१ मे पासून या कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु होत आहे.
बालकामगार, बाल भिक्षेकरी, शाळा बाह्य मुले, बालकांचे आरोग्य
आणि बालविवाह या सारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कामगार विभाग, महिला बालकल्याण
विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पोलीस अशा विभागांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवावयाचा
आहे.
दि.१ मे पासून हे अभियन सुरु होईल. त्यात बाल कामगार आढळण्याची
शक्यता असलेली ठिकाणे शोधून धाडसत्र राबवून बालकामगारांची सुटक करुन त्यांना शिक्षणाच्या
प्रवाहात आणणे. या उपक्रमात कामगार विभाग, जिल्हा कृती दल सदस्य, विशेष बाल पोलीस पथक,
बाल कल्याण पोलीस अधिकारी, चाईल्ड हेल्पलाईनचे अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे
कर्मचारी ही कारवाई करतील. ३१ मे पर्यंत हे अभियान पूर्ण होईल. त्याच धर्तीवर बाल भिक्षेकरी
हुडकून त्यांनाही भिक्षा मागण्यापासून परावृत्त
करुन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येईल. जिल्हा
महिला व बालविकास अधिकारी हे अभियान राबवतील.त्याच प्रमाणे दि.१ ते १५ मे या कालावधीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे
(माध्यमिक व प्राथमिक) शिक्षणाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी मनपा हे शाळा बाह्य मुलांचे
शहरी व ग्रामिण भागात सर्व्हेक्षण राबवतील.
त्यानंतर त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतील.बालकांच्या आरोग्या संदर्भात १ ते
३१ मे दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येईल. त्यात सध्या उष्णतेशी लढा, लसीकरण, जीवनसत्व
विषयक डोस, किशोरवयीन बालकांचे स्वास्थ्य, मान्सिक आरोग्य, पोषण आहार या विषयी घरोघरी
जाऊन जाणीव जागृती करण्यात येईल. या उपक्रमात
प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा वर्कर, अंगणवाडी
सेविका सहभागी होतील. १ मे ते ३० जून
या कालावधीत बालकांच्या हक्कांबाबत जाणीव जागृतीचे अभियान राबविण्यात येईल. त्यात बालकांचे
हक्क, बालकांविषयीचे कायदे, शाळा सुरक्षा नियमावली, बाल संरक्षण इ. बाबत माहिती देण्यात
येईल. या उपक्रमात प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग सहभागी होईल. शहरी भागात मनपाचे
शिक्षणाधिकारी हा उपक्रम राबवतील.
या अभियानाच्या अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी संबंधित उपविभागीय
अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी,
तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक हे या समितीचे सदस्य
असतील. बालविकास प्रकल्प अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या समितीने वेळोवेळी
या उपक्रमाचा आपापल्या तालुक्यात आढावा घेऊन
संनियंत्रण करावे व अभियान राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले
आहेत.
०००००

Comments
Post a Comment