पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 





छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका)- विविध योजनांद्वारे करावयाची जलसंधारणाची  कामे कालबद्ध कार्यक्रम आखून विहित वेळेत पूर्ण करावी. जेणेकरुन पावसाळ्यात पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळीत वाढ झाली पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व संबंधित यंत्रणांना दिले.

            जलसंधारण उपचारांचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल, जिल्हा जलसंधारण अधिकारी विजय कांबळे, सामाजिक वनिकरण विभागाचे एस.बी. फुले तसेच दुरदृष्य प्रणालीद्वारे सर्व तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी आदी सहभागी झाले होते.

            जलयुक्त शिवार २.०, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, लघुसिंचन योजनांची ७ वी व जलसाठ्यांची २ री प्रगणना, १०० दिवसीय कृती आराखडा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

            बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात जलयुक्त शिवार २.० अंतर्गत सुधारीत गाव आराखड्यानुसार २६४३ कामे घेण्यात आली आहेत.  त्यतील १८७९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ६३४ कामे ही अभिसरणातून करण्यात येत आहेत. १७८८ कामे पुर्ण असून २१८ कामे प्रत्यक्ष सुरु आहेत. त्याच प्रमाणे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत  जिल्ह्यात १४० ठिकाणी कामे सुरु असून २५ लक्ष ५५ हजार घनमिटर गाळ काढण्याचे नियोजन आहे. या कामासाठी ग्रामस्थांकडून अजून मागणी वाढत आहे. त्यानुसार त्या कामांचा समावेश करण्यात येत आहे,असे यावेळी सांगण्यात आले.

            जिल्ह्यातील साठ्यांच्या प्रगणनेच्या कामालाही गती द्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामीयांनी यावेळी दिले. ते म्हणाले की, अशा प्रकारे प्रगणना करणऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. जिल्ह्यात विविध ठिकाणी होत असलेले जल व मृद संधारण उपचारांचे काम करतांना त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा. वेळेत ही कामे पूर्ण करावी. जेणे करुन येत्या पावसाळ्याच्या पहिल्या पावसापासून पाणी जिरवता आले पाहिजे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा