सणांच्या पार्श्वभुमिवर खाद्य पदार्थांची विशेष तपासणी मोहिम; स्वतंत्र प्रयोगशाळेसाठी प्रस्ताव द्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 





छत्रपती संभाजीनगर, दि.११ (जिमाका)-  दिवाळीपर्यंतचा चार्तुमास व सणांचा काळ असल्याने व तसेच या कालावधीत पावसाळा असल्याने अन्न व औषध प्रशासनाने बाजारात विक्री होणारे खाद्यपदार्थांची विशेष तपासणी मोहिम राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. तसेच जिल्ह्यासाठी स्वतंत्र अन्न औषध प्रशासन विभागाची अन्न व नमुने तपासणी प्रयोगशाळा तयार करण्याचा प्रस्ताव द्यावा,असेही निर्देश देण्यात आले.

बाजारात विक्री होणारे खाद्य- अन्न पदार्थ, विविध पेये, पाकीटबंद पदार्थ यांच्या तपासणीबाबत विशेष मोहिम राबविण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. या बैठकीस सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन  द.वि. पाटील, सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती प्र.प. सुरसे, श्रीमती सु.त्रि. जाधवर, श्रीमती वर्षा रोडे, एस.बी. तायडे, मो. फ. सिद्दीकी, पी.एस. अंजिठेकर उपस्थित होते.

आगामी सण व उत्सवाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिठाई, फरसाण, सुका मेवा अशा अन्नपदार्थांची विक्री होत असते. मागणी जादा असल्याने भेसळीची शक्यता वाढते. अशावेळी  घातक घटकांनीयुक्त मिठाईपासून नागरिकांचे रक्षण करणे आवश्यक आहे. नागरिकांना सुरक्षित सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून  विशेष मोहिम राबविण्यात यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.  या तपासणीत  मिठाईचे उत्पादन करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी, उत्पादनासाठी वापरण्यात येणारे दुध, खवा, मावा, तूप, साखर, मैदा, आणि इतर घटकांची तपासणी करण्यात येणार आहे. भेसळयुक्त घटकांचा शोध अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ च्या मार्गदर्शक तत्वानुसार, मिठाईमध्ये वापरण्यात येणारे घटक जसे की खवा मावा, आणि तूप हे भेसळयुक्त आहेत किंवा नाही याची खात्री करण्यात येणार आहे.

नागरिकांनी मिठाई खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. मिठाई खरेदी करताना दुकानाची स्वच्छता आणि अन्न परवाना, असामान्य रंग, वास, किंवा चव असलेली मिठाई खरेदी करणे टाळा, परवानाधारक, नोंदणीधारक दुकानातूनच मिठाई खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.

स्वतंत्र प्रयोगशाळेसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

वर्ष २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग स्थान येथेही भाविक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता लक्षात घेता, या कालावधीत भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी  विशेष तयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले. त्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र अन्न, पदार्थ तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा असे निर्देशही त्यांनी दिले. रासायनिक व उपकरणीय तपासणी, औषध नमुने, साधने, उपकरणे, आणि प्रशिक्षित कर्मचारी  व अत्याधुनिक संसाधनयुक्त प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा अशा सुचना त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिल्या. त्याचबरोबर बाटली बंद  पिण्याचे पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करणे, अश्या पाण्याच्या युनिट्सची संपूर्ण तपासणी करण्याचे व त्यावर फिरत्या पथकांमार्फत तपासणी करण्याचे निदे्रश देण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा