जागर स्त्रीशक्तीचा संवाद कार्यशाळा :सशक्त समाज निर्मितीत महिलांची भुमिका मोलाची- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 







छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका)- समाजाची प्रगती होत असतांना हा समाज वैचारीक, सांपत्तिक आणि आरोग्यदृष्ट्या सशक्त असणे आवश्यक असते.कुटुंब सांभाळणारी महिला संस्कार करुन आपले कुटूंब आणि पर्यायाने समाज सशक्त बनवत असते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.

            दशसूत्री कार्यक्रमांतर्गत जागर स्त्रीशक्तीचाया उपक्रमांतर्गत महिला शिक्षकांसाठी विशेष संवाद कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर आदी मान्यवर उपस्थित होते.

            आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, वाचनाने माणूस प्रगल्भ होतो, विचाराने धनवान होतो आणि आरोग्य व संस्कार हे जीवनाचे अविभाज्य अंग आहेत. शिक्षणासोबत वैचारिक प्रगल्भता महत्वाची. नवदुर्गा व त्यांचे माहात्म्य हे आजच्या स्त्री मध्येही आहे. त्यामुळेच आपण सशक्त समाजनिर्मितीत करु शकता,असे त्यांनी सांगितले.

            कार्यक्रमाची सुरुवात महिला शिक्षकांच्या आरोग्य तपासणीने झाली. या कार्यशाळेसाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला शिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी राज्य पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षणाधिकारी मनीषा वाशिंबे यांनी केले. सुत्रसंचालन विस्तार अधिकारी कल्पना पदकोंडे  यांनी केले. आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी धनराज कांबळे यांनी केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा