स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ति संग्रामात अमुल्य योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 





स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे व कमल तलावाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण

 

छत्रपती संभाजीनगर, दि.16, (जिमाका) :- मराठवाडा मुक्ति संग्रामाच्या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत करून महिला व अनेक स्वातंत्र्यसैनिकांना सोबत घेऊन निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त केले. हे योगदान अमुल्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  

क्रांती चौक येथील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे अनावरण करून लोकार्पण केले. तसेच याच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ऐतिहासिक कमल तलावाचेही लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड, आमदार संजय केणेकर, आमदार अनुराधा चव्हाण, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह मराठवाडा मुक्ति संग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, खऱ्या अर्थानं मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी मोलाची भूमिका पार पाडली ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये या ठिकाणी आल्यानंतर मला मनापासून समाधान होत आहे. त्यांचे संपूर्ण जीवन ते व्रतस्त होते. स्वामी रामनंद तीर्थ हे खेडगीकर कुटुंबामध्ये जन्माला आले. यात त्यांचे एक शिक्षक म्हणून जीवन पाहायला मिळते, दीक्षा घेतल्यानंतर ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. स्वामी विवेकानंदाप्रमाणेच तरूणाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी देशभक्ती जागृत केली. 15 ऑगस्ट, 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला असला तरी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळण्याकरीता 17 सप्टेंबर 1948 म्हणजे जवळपास 13 महिन्याचा कालावधी लागला. 13 महिने मराठवाडा निजामाशी झुंजत होता.या कालावधीत मराठवाडा निजामाच्या इस्टेटचा भाग होता. ज्या 13 महिन्याच्या आधीच सुरू असलेल्या रजाकारांच्या संपूर्ण अन्यायाची पराकाष्टा झाली होती आणि त्याच्याविरुद्ध एक मोठा रणसंग्राम उभा झाला होता. यामध्ये इतर स्वातंत्र्यसैनिकांचे स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्यात नेतृत्व केले. या लढयाला एक प्रकारे संघर्षाच्या लढयामध्ये त्यांनी परिवर्तित केले. हैदराबाद असो की मराठवाडा असो या सगळीकडे त्यांनी जी काही स्वतंत्र अस्मितेची ज्योत पेटवली, त्यातून अनेक तरुण अनेक महिला या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये उतरल्या आणि त्यातून हैदराबादच्या निजामाच्या जोखडातून आपण मराठवाड्याला मुक्त करू शकलो. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या मातब्बर गृहमंत्र्यांनी त्यांच्या या स्वतंत्र संग्राम सेनानींच्या हाकेला प्रतिसाद देत सैनिकी कारवाई केली आणि त्यातून मराठवाडा मुक्त झाला. तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948 हा होता. तो आता दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन म्हणून आपण साजरा करतो आणि त्यावेळी प्रामुख्याने आपण स्वामी रामानंद तीर्थ यांचा  पुण्यस्मरण करत आज त्यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ऐतिहासिक कमल तलावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. महानगरपालिकेने कमल तलावाच्या पुनर्जिवनाचे काम केल्याबद्दल महापालिका आयुक्त जी.श्रीकांत  आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. छत्रपती संभाजीनगर शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक नवीन ठिकाण कमल तलाव म्हणून पाहण्यास उपलब्ध झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वामी रामनंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे शिल्पकार निरंजन मडिलगेकर यांचा यावेळी  मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कमल तलावाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्वत: तिकीटाची खरेदी करून कमल तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचे जाहिर केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा