‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम सर्वसमावेशक करण्यासाठी नियोजन करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 






छत्रपती संभाजीनगर, दि.८(जिमाका)-  ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे नियोजन  प्रशासनामार्फत व गुरुद्वारासंस्थांमार्फत होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाणारे भाविक, यात्रेकरु यांची व्यवस्था करणे तसेच गुरु तेग बहादुर यांच्या बलिदानाचा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून हा कार्यक्रम सर्वसमावेशक करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

            नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या  जिल्ह्यातील  भाविकांचा सहभाग, या परंपरेची माहिती अधिक्दहिक लोकांपर्यंत पोहोचविणे याबाबतचा पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी  जनार्दन विधाते,मनपा अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त लखिचंद चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्य.) आश्विनी लाठकर,  जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ,अन्न निरीक्षक वर्षा रोडे, गुरुद्वारा संस्थांशी संबंधित नंदकुमार अहुजा, गुरुज्ञान सिद्ध रणवीरसिंह , नरेंद्रसिंग तारासिंग जबिंदा, हरिंदरसिंग, जगदेव सिंग, रमेश वधवा, राज्य समिती सदस्य उत्तम चव्हाण, डॉ. सुदाम चव्हाण, करतार राठोड, कुलदीपसिंग छाबडा,सरदार हरिसिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

            प्रारंभी माहिती देण्यात आली की, शहीदी समागम वर्षानिमित्त राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांना मानणारे लाखो भाविक नांदेडमध्ये येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन असे नऊ समाज-संप्रदाय एकत्र येणार आहेत. श्री गुरु तेग बहादुर यांच्या त्याग, बलिदान व मानवतेसाठी दिलेल्या शहीदीचा इतिहास देश-विदेशात पोहोचवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.यात  युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

            तसेच भाविकांच्या सोयीसाठी  https://gurutegbahadurshahidi.com  या संकेतस्थळावर रस्ते, रेल्वे, बस, वाहतूक व्यवस्था तसेच कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

            जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महानगरपालिका, शाळा-महाविद्यालये, पोलीस यंत्रणा व परिवहन विभागाने समन्वयाने सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांची नोंद घेणे. त्यांच्याशी समन्वय साधून नांदेड येथील वाहनतळ व अन्य अनुषंगिक व्यवस्थांबाबत त्यांना अवगत करणे. या आयोजनासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्ति, संस्थांशी समन्वय साधणे, या आयोजनाबाबत तसेच या इतिहासाबाबत जनजागृती करणे यासंदर्भात नियोजन करण्यात यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. या कार्यक्रमात सर्व समाजातील लोकांचा सहभाग घ्यावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा