पर्यावरणीय बदलांबाबत करावयाच्या उपाययोजनांचा विभागनिहाय आराखडा तयार करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, दि.27(जिमाका) – पर्यावरणीय बदल व त्यानुसार होणाऱ्या एकंदर वातावरण,
आरोग्य, जैवविविधता, पीक पद्धती यात होणाऱ्या बदलांबाबत शासनाच्या विविध विभागांनी
आपापल्या विभागाच्या उपाययोजना राबवावयाच्या आहेत. त्याचा जिल्ह्याचा आराखडा तयार करावा,असे निर्देश आज जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांनी दिले.
राज्यातील अमृत शहरे, जिल्हे आणि
महसूल विभागांमध्ये वातावरणीय कृती कक्ष स्थापन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यासंदर्भात
आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
अंकीत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय
धानोरकर,मनपा उपायुक्त स्वप्नील राठोड, माविमचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड, सामाजिक
वनीकरण विभागाचे विभागीय वन संरखक संदीप गिरी, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता
श्रीमती एस.जी. शाहपुरे, सहा. वनसंरक्षक आशा चव्हाण, न.प. प्रशासन सहा. आयुक्त ऋषिकेश
भालेराव, सिल्लोड मुख्याधिकारी भागवत बिघोत, फुलंब्री मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे,
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशीक संचालक अच्युत नांदवटे, इको सत्ता
संस्थेच्या गौरी मिराज, वीज वितरण कंपनीचे मनिष ठाकरे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास
महामंडळाचे विभागीय अधिकारी अमित भामरे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पर्यावरणीय बदल, हवा,
पाणी, माती यावर त्याचे होत असलेले परिणाम, प्रदुषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांना
प्रतिबंध करणे, त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आराखडा
द्यावयाचा आहे. त्यासाठी बैठक बोलावण्यात आली. त्यात प्रत्येक विभागाने आराखडा तयार
करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी विल्हेवाट,
जमिनीचे आरोग्य सुधारणे याबाबत उपाययोजनांचा ह्यात समावेश असावा,असेही सांगण्यात आले.
०००००


Comments
Post a Comment