मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषेची समृद्धी व वैभव जोपासणे हे प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीचे कर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा
अमूल्य वारसा आहे. या भाषेची समृद्धी व वैभव जोपासणे प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तिचे
कर्तव्य आहे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा
गौरव दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजीत
या कार्यक्रमास युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी रवी कोरडे, उपजिल्हाधिकारी
संगिता राठोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
साहित्यिक रवी कोरडे
म्हणाले की, मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून आपल्या संस्कृतीची, परंपरेची
आणि विचारसंपदेची वाहक आहे. कुसुमाग्रज यांच्या साहित्यकार्याचा उल्लेख करत त्यांनी
मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची आठवण करून दिली. मराठी ही प्राचीन, समृद्ध आणि अभिमानास्पद
भाषा आहे. प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मातृभाषेचा सन्मान राखला पाहिजे,असे त्यांनी
ठामपणे नमूद केले. इतर भाषांचे ज्ञान आत्मसात करत असताना मराठी भाषेची जपणूक आणि प्रचार-प्रसार
करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थितांना, वाचन संस्कृती
जोपासण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, वाचन
वाढले की, भाषा समृद्ध होते आणि समाज अधिक विचारसंपन्न बनतो. मराठी भाषा लिहिताना शुद्धलेखनाची
काळजी घेणे आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा अधिक वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी
सांगितले.
सूत्रसंचालन श्रीमती रोहिणी माळी यांनी केले.
०००००




Comments
Post a Comment