इतर राज्यातून येणाऱ्या पशुधनाचे टॅगिंग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका). जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पशुधनांचे
योग्य वेळी लसीकरण आणि त्यांचे खरेदी-विक्री पारदर्शक व्हावी यासाठी त्यांचे टॅगिंग
होणे आवश्यक आहे, शासकीय नियमानुसार शेतकरी किंवा पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांच्या नावाशी पशुधनाचे टॅगिंग नोंदीत असणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप
स्वामी यांनी सांगितले.
सीमेलगत असणाऱ्या विविध राज्यातून येणारे पशुधन याचे
टॅगिंग नसल्यामुळे खरेदी विक्रीचा व्यवहार हा पारदर्शक पद्धतीने होत नसल्याचे दिसून
येते आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात येणाऱ्या पशुधनाचे
टॅगिंग आणि नोंदणी असणे आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी पशु पशुसंवर्धन विभाग, पोलीस
प्रशासन आणि परिवहन विभाग यांनी याबाबत वाहतूक होत असताना तसेच खरेदी-विक्री होत असताना
टॅगिंग असणाऱ्या पशुधनाची तपासणी करण्यात यावी. संबंधित व्यापाऱ्यांना पशुधन बाजाराच्या
ठिकाणी जनावरांच्या जसे गाय, बैल, शेळी, म्हैस,
यांच्या कानावर असलेल्या बिल्ला किंवा शिक्का आहे किंवा नाही याची माहिती देणारे पत्र किंवा लेखी
नोंदी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उष्माघातापासून
बचाव करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पशुधनाची योग्य काळजी घेण्यासाठी लसीकरण, चारा
उपलब्धता आणि पाण्याची व्यवस्था याबाबत नियोजन करावे.उष्माघात पासून बचाव करण्यासाठी
प्रतिबंधात्मक सूचना शेतकऱ्यांना देण्यात याव्यात . २९ मार्चपूर्वी जिल्ह्याच्या पशुधन
लसीकरणाचे दिलेले उद्दिष्ट विभागाने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले .
जिल्ह्यामधील पशुधनाच्या लाळ खुरकूत
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत ५७% लसीकरण पूर्ण झाल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नानासाहेब कदम यांनी सांगितले.
00000



Comments
Post a Comment