बॅंकांची जिल्हा सल्लागार व संनियंत्रण समिती बैठक सन २०२६-२७ साठी वित्त पुरवठ्यात २५०० कोटी रुपयांची वाढ
छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका)-बॅंकांकडून जिल्ह्यात केल्या जाणाऱ्या
वित्त पुरवठ्यात यंदा २५०० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या बॅंकांच्या
जिल्हा सल्लागार व संनियंत्रण समिती बैठकीत यंदा आर्थिक वर्ष २०२६-२७ करीता ३६ हजार
कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा सादर करण्यात आला व त्यास मान्यता देण्यात आली.
बॅंकांच्या जिल्हा सल्लागार व संनियंत्रण
समिती बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक
अशोक सिरसे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक
सुरेश पटवेकर, रिजर्व बॅंकेचे सहा. प्रबंधक अमितकुमार मिश्रा, कृषी उपसंचालक दीपक गवळी
तसेच सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत माहिती सादर करण्यात आली की, जिल्ह्याचा विद्यमान आर्थिक
वर्षात ३३ हजार ५०० रुपयांचा वित्त पुरवठ्याचे नियोजन होते. त्यापैकी ९१ टक्के उद्दिष्ट
पूर्ती करण्यात आली. म्हणजेच ३० हजार ३२२ कोटी ९१ लक्ष रुपये इतका वित्त पुरवठा बॅंकांमार्फत
विविध क्षेत्रात आतापर्यंत या आर्थिक वर्षात करण्यात आला. सन २०२६-२७ करीता पीक कर्जासाठी २४०० कोटी रुपये, कृषी कर्ज ३६००
कोटी रुपये एकुण कृषी क्षेत्रासाठी ६ हजार कोटी रुपये. तर सुक्ष्म व लघु उद्योग क्षेत्र
१० हजार ६०० कोटी रुपये, इतर प्राधान्य क्षेत्र १४०० कोटी रुपये असे एकूण प्राधान्य क्षेत्र १८ हजार कोटी रुपये व प्राधान्य
क्षेत्राबाहेरील क्षेत्रात १८ हजार कोटी असे एकूण ३६ हजार कोटी रुपयांचे वित्त पुरवठ्याचे
उद्दिष्ट असून त्यात गत वर्षाच्या तुलनेत २५००
कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित
मोघे यांनी दिली.
सर्व बॅंकानिहाय आढावाही घेण्यात आला. रोजगार व स्वयंरोजगाराला
चालना देणाऱ्या योजनांना अर्थसहाय्य द्यावयाची प्रकरणे मार्गी लावावीत,असे निर्देश
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी दिले. बैठकीत नाबार्डच्या सन २०२६-२७ या आर्थिक
वर्षाच्या संभाव्य कर्ज संलग्न आराखडाचे प्रकाशन जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते
करण्यात आले.




Comments
Post a Comment