महासाधना सप्ताह; सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘कर्मयोगी’ प्रशिक्षण पूर्ण करावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका)- राज्य शासनाच्या महा साधना सप्ताह या उपक्रमांतर्गत
सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमात
जिल्ह्यातील सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी सहभागी व्हावे व प्रशिक्षण पूर्ण करावे,असे
आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
भारत सरकार क्षमता विकास आयोग आणि
कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ ते ८ या दरम्यान ‘साधना सप्ताह’ राबविण्यात
येणार आहे. राज्य शासनातील अधिकारी- कर्मचारी यांना I Got कर्मयोगी या प्लॅटफॉर्मवर किमान ४ तासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या
प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात आज एका प्रशिक्षण कार्यशाळेद्वारे करण्यात आली. स्मार्ट
सिटी सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले. या कार्यशाळेस सर्व विभागप्रमुख, कार्यालयप्रमुखांनी तसेच क्षेत्रीय व तालुकास्तरीय अधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे
सहभागी झाले होते.
माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे समन्वयक
शरद दिवेकर यांनी महा साधना सप्ताह, तसेच i-Got प्रणाली नोंदणी व पूर्ण करावयाचे अभ्यासक्रम
याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले.
राज्य शासनाने हा उपक्रम ‘महासाधना’
उपक्रम म्हणून राबविण्याचे ठरविले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदलत्या काळातील
आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक बनविण्याचा
प्रयत्न होत आहे. या उपक्रमांतर्गत विविध सादरीकरणे, मार्गदर्शन सत्रे आणि प्रशिक्षण
कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, ई-गव्हर्नन्स
प्रणाली, प्रभावी संवाद कौशल्य, तसेच कार्यालयीन कामकाजातील कार्यक्षमता वाढविण्यावर
विशेष भर देण्यात आला आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांना
अद्ययावत ज्ञान व कौशल्ये आत्मसात करता यावीत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात
सर्व विभागांचे व सर्व वर्गातील मिळून २६ हजार
७९७ अधिकारी- कर्मचारी कार्यरत आहेत. हे सर्व अधिकारी कर्मचारी या प्रशिक्षण
कार्यक्रमात सहभागी होतील.
प्रशासनातील कामकाज अधिक सुलभ, जलद
आणि पारदर्शक करण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार आहे. तसेच नागरिकांना वेळेत आणि
दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरेल,असे मत जिल्हाधिकारी
स्वामी यांनी व्यक्त केले.शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आधुनिक प्रशिक्षणाने अद्यावत
करणाऱ्या या उपक्रमात सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी सहभागी होऊन नेमून दिलेल्या कालावधीत
प्रशिक्षण पूर्ण करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
०००००




Comments
Post a Comment