फुलंब्रीतील महिलेची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली; पाणीपुरी व ज्यूस सेंटरमधून स्वावलंबनाकडे वाटचाल

 






 

छत्रपती संभाजीनगर,दि,२१(जिमाका)- जिद्द, मेहनत आणि बचत गटाच्या माध्यमातून उभारलेला व्यवसाय यामुळे फुलंब्री तालुक्यातील सुनिता संतोष शिंदे या यशस्वी उद्योजिका म्हणून समोर आल्या आहेत. स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करत इतर महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

सुनिता शिंदे या फुलंब्री येथील गृहिणी. २०१९ मध्ये त्यांनी स्वामी समर्थ महिला बचत गटात प्रवेश घेतला. बचतीबरोबरच व्यवसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आम्रपाली लोकसंचालित साधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रशिक्षण व चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. यानंतर त्यांनी बँक कर्जाच्या सहाय्याने रेडीमेड कपड्यांचे दुकान सुरू केले.

दरम्यान, २०२० मध्ये नव्या संधींचा शोध घेत त्यांनी पाणीपुरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. बचत गटातून ५० हजार रुपयांचे कर्ज घेऊन पाणीपुरी गाडी सुरू केली. सुरुवातीला रोज १,००० ते १,५०० रुपयांची उलाढाल होत होती. पुढे वैयक्तिक बँक कर्जाच्या माध्यमातून सुमारे २ लाख रुपयांचे भांडवल उभारून त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला आणि ज्यूस सेंटरही सुरू केले.

सध्या त्यांच्या पाणीपुरी व ज्यूस व्यवसायातून दररोज २,५०० ते ३,००० रुपयांची उलाढाल होत असून एकूण मासिक उलाढाल २ ते अडीच लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सर्व खर्च वजा जाता सुमारे १ लाख रुपयांपर्यंत निव्वळ बचत होत आहे. त्यांच्या या व्यवसायामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली असून मुलांच्या शिक्षणासाठीही त्यांनी भक्कम आधार निर्माण केला आहे.

खुलताबाद रोड, फुलंब्री येथे दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत त्यांचा पाणीपुरी व ज्यूस सेंटर व्यवसाय सुरू असतो. विशेष म्हणजे, त्यांनी बचत गटातील दोन महिलांना रोजंदारीवर रोजगार उपलब्ध करून दिला असून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीतही त्यांनी हातभार लावला आहे.

प्रत्येक महिलांनी जिद्द ठेवून व्यवसाय सुरू करावा. बचत गट हा महिलांसाठी मोठा आधार ठरू शकतो, असा संदेश सुनिता शिंदे यांनी दिला आहे. त्यांच्या यशोगाथेमुळे फुलंब्री तालुक्यातील अनेक महिलांना उद्योजकतेची प्रेरणा मिळत आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा