तलाठी निवडीच्या बनावट आदेशांना बळी पडू नका;जिल्हा प्रशासनाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.८(जिमाका)- जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींच्या मार्फत भूलथापा देऊन तलाठी निवडीचे आदेश देऊन फसवणूकीचे प्रकार होत असल्याचे
निदर्शनास आल्याच्या पार्श्वभुमिवर जिल्हा प्रशासनाने अशा बनावट आदेशांना बळी पडू नका,
असे आवाहन केले आहे.सन २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेनंतर असे कोणतेही आदेश जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या जिल्हा निवड समितीमार्फत देण्यात आलेले नाहीत,असेही जिल्हा प्रशासनाने
स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि
अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख पुणे व टीसीएस कंपनीकडून ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)
भरती २०२३ करीता ऑगस्ट- सप्टेंबर २०२३ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत
जिल्हा निवड समिती छत्रपती संभाजीनगर साठी १५४ पदांची जाहिरात देण्यात आली होती. निवड
व प्रतिक्षा यादीत उमेदवारांची संख्या १५३ होती.त्यापैकी १४४ जणांना नियुक्ती देण्यात
आली आहे. या व्यतिरिक्त कुणालही ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) निवडीचा कुठलाही आदेश
जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला नाही. तरी नागरिकांनी तलाठी पदभरती २०२३ ची मुदत संपल्याने
अज्ञात व्यक्तिंच्या भुलथापांना बळी पडू नये. तलाठी पदभरती बाबत वस्तूनिष्ठ माहिती
घेण्यासाठी अथवा तक्रार देण्यासाठी अभिप्राय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती
संभाजीनगर (संपर्क क्रमांक ०२४०-२९८८०७७) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले
आहे.
०००००
Comments
Post a Comment