आश्रमशाळांमध्ये अॅनिमिया निवारण मोहीम
‘सीएसीआर’ च्या करारांतर्गत ७९ हजार ६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी
छत्रपती संभाजीनगर दि.२५- राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये अॅनिमिया (रक्तक्षय) निवारणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अवघ्या दीड महिन्यात राज्यातील २०४ शाळांमधील ७९ हजार ६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी पूर्ण करण्यात आली आहे,असे आदिवासी विकास विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांमधील अॅनिमियाचे प्रमाण कमी करून त्यांचे आरोग्य सुदृढ राखण्याच्या उद्देशाने विभागामार्फत ‘अॅनिमिया निवारण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाने ‘सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स’ (सीएसीआर) या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत आश्रमशाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी तपासण्यात येत आहे.
या मोहिमेत १४९ शासकीय आश्रमशाळांमधील ५५ हजार ८६८, ४८ अनुदानित आश्रमशाळांमधील २२ हजार ४२० तसेच ६ एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील १ हजार ३३६ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये ३७ हजार ९१९ विद्यार्थी आणि ४१ हजार ७०५ विद्यार्थिनींचा समावेश आहे.
नाशिक विभागात सर्वाधिक तपासणी
नाशिक विभागातील- १०४ शाळांमधील ४१ हजार ४६९ विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ८० शासकीय आश्रमशाळांमधील ३१ हजार ३९३, २१ अनुदानित आश्रमशाळांमधील ९ हजार २२७ आणि ३ एकलव्य शाळांमधील ८४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ठाणे विभागातील -८१ शाळांमधील ३३ हजार ४२६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५९ शासकीय आश्रमशाळांमधील २२ हजार ५४, १९ अनुदानित आश्रमशाळांमधील १० हजार ८८५ आणि ३ एकलव्य शाळांमधील ४८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अमरावती विभागात- ८ शासकीय आश्रमशाळांमधील १ हजार ८८५ आणि ३ अनुदानित आश्रमशाळांमधील १ हजार १३ अशा एकूण २ हजार ८९८ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली आहे. नागपूर विभागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचीही तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.
एचबी कमी असलेल्या विद्यार्थ्यांना पूरक आहार
तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळले आहे, त्यांना आवश्यक पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अॅनिमियाचे वेळीच निदान करून विद्यार्थ्यांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणणे आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राखणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
“आदिवासी विद्यार्थ्यांचे सुदृढ आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण याला विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ‘अॅनिमिया निवारण कार्यक्रमाच्या’माध्यमातून विद्यार्थ्यांमधील रक्तक्षयाच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन युद्धपातळीवर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अवघ्या दीड महिन्यात ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली आहे.”
– लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग
Comments
Post a Comment